विराट कोहली,रोहित शर्मा यांची पोकळी भरून काढणे कठीण : अजित आगरकर   

मुंबई  : इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर नवीन कर्णधाराची प्रतीक्षाही संपली. बीसीसीआयने २५ वर्षीय शुभमन गिलला कसोटी संघाचा नवा कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी संघाची घोषणा केली. आगरकरने यावेळी कबूल केले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे पोकळी भरून काढणे कठीण आहे. इंग्लंड दौर्‍यावर इतर खेळाडू जबाबदारी घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आज शनिवारी पत्रकार परिषदेसाठी आले. यामध्ये, सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर अजित आगरकर यांनी विराटच्या निवृत्तीबद्दल सांगितले की, कोहलीने एप्रिलच्या सुरुवातीलाच बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल माहिती दिली होती. विराटने सांगितले होते की त्याने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.इंग्लंड दौर्‍यासाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकर म्हणाले, ’क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू निवृत्त होतात, तेव्हा ती जागा भरणे नेहमीच कठीण असते. त्याची जागा भरणे हे एक मोठे काम आहे. पण त्याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे ती इतरांसाठी एक संधी आहे.’ या दोन सुपरस्टार्सच्या जागी, युवा डावखुरा साई सुदर्शन आणि अनुभवी करुण नायर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. आगरकरने खुलासा केला की, कोहलीने गेल्या महिन्यात कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपर्क साधला होता आणि कसोटी क्रिकेट सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.  
 
इंग्लंड दौर्‍यापर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना राहण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का? या प्रश्नावर आगरकर म्हणाले की, आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (२०२५-२७) नवीन संघ तयार करणे हे प्राधान्य आहे. काही दिवसाआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, जेव्हा एखादा खेळाडू निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो त्याचा निर्णय असतो.निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे. हे नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्र आहे आणि आम्ही संघ तयार करण्यास मदत करण्यासाठी सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहोत. 

Related Articles